अहिल्यानगर MP Nilesh Lanke : खासदार निलेश लंके यांच्या पुढाकारानं रायरेश्वर गडावर वृक्षारोपण, स्वच्छता अभियान आणि गड संवर्धन मोहिमेचा शुभारंभ रविवारी करण्यात आला. भर पावसात शेकडो कार्यकर्त्यांच्या सहभागानं पार पडलेली ही मोहीम गडकोटांच्या संवर्धनासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल मानलं जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून गड किल्ले संवर्धनाच्या माध्यमातून राज्यातील गड किल्ल्यांची स्वच्छता, वृक्षारोपण त्याचप्रमाणे संवर्धनाची कामं प्रत्येक महिन्याच्या एक रविवारी करत असतात. यापूर्वी त्यांनी शिवनेरी तसंच श्रीगोंदा तालुक्यातील धर्मवीर गडाची देखील स्वच्छता व संवर्धनाची कामं केली होती. यावेळी बोलताना खासदार निलेश लंके म्हणाले, "स्वराज्यातील गड किल्ले हे छत्रपती शिवाजी महाराजांची जिवंत स्मारकं आहेत. ते शिवरायांच्या गौरवशाली इतिहासाची व पराक्रमाची साक्ष देत उभे आहेत. आपल्या या इतिहासाचं व गड किल्ल्यांचं जतन व संवर्धन करणं गरजेचं आहे. यासोबतच छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास जनतेपर्यंत पोहोचावा आणि त्यांच्या किल्ल्यांचा ठेवा सुस्थितीत राहावा. आपला ऐतिहासिक वारसा आपल्या भावी पिढीला समजावा यासाठी हा उपक्रम सुरु केला आहे. दर महिन्याच्या एका रविवारी वेगवेगळ्या गडांवर ही मोहीम राबवली जाणार आहे." रायरेश्वर गड हा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतलेला पवित्र गड असल्यानं या मोहिमेला विशेष ऐतिहासिक महत्त्व लाभलं आहे.