नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे देशभरात एकच खळबळ उडाली असून दहशतवाद्यांना संपवा अशी मागणी केली जात आहे. देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या दहशतवादी हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली आहे. धर्माच्या आधारे पर्यंटकांची हत्या करणे, निर्दोषांना ठार करणे हे कृत्य निंदनीय आहे. या हल्ल्यातील दहशतवाद्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही, त्यांना जशास तसं उत्तर दिलं जाणार अशा इशारा राजनाथ सिंह यांनी दिला. या हल्ल्यामध्ये सहभागी असलेल्या दहशतवाद्यांसोबतच पडद्यामागे जे कोणी यामध्ये सहभागी असतील त्यांना संपवलं जाईल असंही राजनाथ सिंह म्हणाले.
काय म्हणाले राजनाथ सिंह?
राजनाथ सिंह म्हणाले की, "दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये केलेल्या भ्याड हल्ल्यात आपल्या देशाने अनेक निष्पाप नागरिकांना गमावले. या अत्यंत अमानुष कृत्याने आम्हा सर्वांना दुःख आणि वेदना झाल्या आहेत. सर्वप्रथम ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्या सर्व कुटुंबांप्रती मी मनापासून संवेदना व्यक्त करतो. या दुःखाच्या प्रसंगी, दिवंगत आत्म्याच्या शांतीसाठी, मी ईश्वराकडे प्रार्थना करतो."
राजनाथ सिंग पुढे म्हणाले की, "आम्ही दहशतवादाविरुद्ध शून्य सहिष्णुता धोरण (Zero Tolerance Policy) बाळगतो. या भ्याड कृत्याविरुद्ध भारतातील प्रत्येक नागरिक एकवटला आहे. मी देशवासियांना आश्वासन देतो की, ही घटना लक्षात घेता भारत सरकार आवश्यक आणि योग्य ते सर्व पाऊल उचलेल. ज्यांनी पडद्याआड बसून भारताच्या भूमीवर अशी घृणास्पद कृत्ये करण्याचा कट रचला आहे त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचू."