जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशवाद्यांनी (Terrorist) पर्यटकांवर अंधाधुंद गोळीबार केला. दहशतवाद्यांच्या या हल्ल्यात 27 पर्यटकांना आपला जीव गमवावा लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. येथे शस्त्रधारी दोन ते तीन दहशतवाद्यांना पर्यटकांच्या एका ग्रुपवर भ्याड हल्ला केला. त्यामध्ये, अनेक पर्यटकांचा जीव गेला असून काही गंभीर जखमी देखील झाले आहेत. दहशतवाद्यांना 40 राऊंड फायर केल्याचे सांगण्यात येते. या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री यांच्याच फोनवरुन बोलणे झाले. त्यानंतर, गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) तातडीने श्रीनगरकडे रवाना झाले आहेत.
जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याने आपण व्यथित झालो आहोत. मृतांच्या कुटुंबियांप्रती माझ्या सहवेदना आहेत. या भ्याड दहशतवादी हल्ल्यातील दहशतवाद्यांना सोडणार नाही, त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करू, असा इशाराच गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विटरवरुन दिला आहे. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदींना देखील त्यांनी या घटनेची माहिती दिली. त्यानंतर, संबंधित अधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली असून श्रीनगरला गेल्यावर सर्व सुरक्षा एजन्सींसोबत तातडीची सुरक्षा आढावा बैठक घेण्यात येणार आहे. त्यासाठी, आपण श्रीनगरला रवाना होत असल्याचेही अमित शाह यांनी ट्विटरवरुन सांगितले. दरम्यान, अमित शाह दिल्लीतून श्रीनगरला रवाना झाले आहेत.